Showing posts with label आत्मचरित्र. Show all posts
Showing posts with label आत्मचरित्र. Show all posts

Saturday, December 24, 2016

एकटा जीव

एकटा जीव

दादा कोंडके यांचं हे प्रांजळ आत्मचरित्र कधी वाचेन असं खरंच वाटलं नव्हतं. त्यांचे चित्रपट म्हणजे फक्त निर्बुद्ध ,द्वयर्थी संवाद युक्त, सुमार अभिनय-गाणी असलेले असं माझं मत होतं. चित्रपटाबद्दल मतपरिवर्तन व्हावं असं काही घडलं नसलं तरी दादा कोंडके या व्यक्तीबद्दल मात्र उगाच मन कलुषित झालं होतं , “ जसे ते ,तसेच त्यांचे चित्रपट,” या ठाम गैरसमजुतीमुळे त्यांच्या विषयी काहीही वाचण्याच्या भानगडीत पडले नव्हते.

‘ पन्नाशीचा भोज्या ’ हे पुस्तक पुन्हा वाचताना ,दादांच्या प्रकरणाशी थबकले.वाटलं , अभ्यंकारांचं पुस्तक मला आवडलं आणि त्यांना दादांचं , मग आपणही  ‘ एकटा जीव ‘ वाचायला हवं.

आत्मचरित्रात जर काहीच अशक्यप्राय , धक्कादायक नसेल तर ते बोर किंवा सपक नाहीतर अप्रामाणिक ,लपवाछपवी करणारं आहे असं वाटतं. याउलट काही गौप्यस्फोट असेल तर “ थापा तर नाहीत ना “ असं वाटत. आत्मचरित्र लिहिणे ही अशी तारेवरची कसरत ! पण मला असं वाटतं की आत्मचरित्र खरं की खोटं हे सांगणं कठीण -सारख्या घटनांचे पडसाद , त्यांचं interpretation प्रत्येकासाठी वेगळ असू शकतं.

Truth is never absolute, it is relative !

दादांनी आपला व्रात्य स्वभाव, गुंडगिरी ,शिक्षणातली एकूणच प्रगती याबद्दल प्रामाणिकपणे लिहिलंय,पण कुठेतरी स्वतःचे थोडेफार समर्थनही केलंय- गुंडागर्दीतुन आपल्याला पैसे कमवायचे नव्हते ,तर मिरवणे कधी मोठेपणा घेणे यासाठी हे सर्व उद्योग केले.

एका संघाच्या सामान्य सेवकापासून ते यशस्वी वगकर्त्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी . ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ अत्यंत यशस्वी लोकनाट्य -माझ्या पिढीला ते मूळ संचात पाहता आलं नाही हे आमचे दुर्दैव . अत्यन्त हजरजबाबी,आणि पोट धरून हसायला लावणारे चुरचुरीत संवाद ज्यात चालू घडामोडींवर भाष्य असे -त्यामुळे प्रत्येक प्रयोग नवा वाटे. ३-४ तास चालणारे प्रयोग म्हणजे कलाकारांची जणू परीक्षाच !

त्यांचा बावळट,अजागळ ,लोम्बती नाडीवाली अर्धी विजार घातलेला अवतार चांगलाच प्रसिद्ध झाला. त्यांच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांनी चांगली कमाई केली.दादांच्या मते शहरातले उच्चभ्रू लोक जरी त्यांच्या सिनेमाला नावं ठेवत असले तरी गुपचूप अंधारात हसत.ग्रामीण भागात त्यांचे सिनेमा खूपच लोकप्रिय होते.दादा म्हणतात, माझे चित्रपट चालले कारण त्या बावळट नायकात लोकांना आपले प्रतिबिंब दिसे ….

या व्यवसायात राहूनही पूर्णपणे निर्व्यसनी असा माणूस मिळणे दुर्मिळ -दादा तसेच होते.त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती ,काही वेळा धक्कादायक (आशा भोसले), तर काही वेळा काहीशी अपेक्षित (उषा चव्हाण). मंगेशकर भगिनींबद्दलचे त्यांचे विचार खरे असतील असं वाटल्याशिवाय राहवत नाही.यातले सर्वात मनोरंजक प्रकरण म्हणजे ‘ शेणसार बोर्ड’  - जे दादांच्याच शब्दांत वाचायला हवे.

आयुष्याच्या शेवटी सर्व काही असूनही ते एकटे होते. त्यांची खंत,दुःख, एकटेपणा जाणवतो. ”पुढल्या जन्मी पैसे,मन,सन्मान नको ,पण प्रेमाची माणसे दे” - या पुस्तकाचे नाव सार्थक ठरवणारे दादांचे मनोगत.

या पुस्तकाचे शब्दांकन अनिता पाध्ये यांनी केलंय. यात कुठेही त्यांचा आवाज ऐकू येत नाही, दादांचं जाणवतात,यातच त्यांच्यातल्या लेखिकेचे यश आहे.

Saturday, July 16, 2016

अमलताश

खरं तर हे पुस्तक पाहीले तेव्हापासूनच ह्याबद्दल उत्सुकता होती.....
१.अमलताश म्हणजे काय ? ( एक पिवळ्या फुलांच झाड , आणि लेखिकेच्या कराडमधल्या घराचं नाव . या पुस्तकाचं मुखपृष्ठही अमलताशचच ! पिवळधम्मक ! )
२.मौज प्रकाशन...म्हणजे नक्कीच वाचनीय !
३.प्रकाश नारायण संत यांची पुस्तकं मला फार आवडतात ....त्यांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल काहीतरी वाचायला मिळेल ...लंपन ह्या त्यांच्या मानसपुत्राची जन्मकथा वगैरे.....
४.लेखक पत्नींची आत्मचरित्रे तशीही मला वाचायला आवडतात ( त्याबद्दल थोडे पुढे सविस्तर )
आपल्याला जो लेखक पुस्तकातून भेटतो ,आपण त्याच्या लिखाणावरून , त्याच्याबद्दल काही आडाखे बांधत असतो.पण कधीकधी तो लेखक खऱ्या जीवनात फार वेगळाही असू शकतो.आपल्याला वाटतात तसे खरच संत होते का ?
५.त्यांच्या नावाच रहस्य ! ( सुप्रिया भालचंद्र दिक्षित ह्या प्रकाश नारायण संत ह्यांच्या पत्नी ! आणि संत हे इंदिरा संतांचे चिरंजीव ! )

ह्या पुस्तकाबद्दल सांगण्याआधी या पुस्तकाच्या अनुषंगाने मनात आलेले काही विचार....

एखाद्या आत्मचरीत्राबद्दल लिहिताना मला नेहमी वाटतं , मी कोणाबद्दल लिहितेय....पुस्तकावर की त्या व्यक्तीवर ?
कोणी एखादी व्यक्ती आपला आयुष्य आपल्यापरीने जगतेय ...लढतेय...आणि तुम्हाला त्याबद्दल सांगू पाहतेय , म्हणून आपण त्यावर काही भाष्य करावे का ?  खरं तर आपलं आयुष्य मोकळेपणे मांडायला धैर्य लागतं ,मग खरं तर प्रत्येक आत्मचरित्राच कौतुक व्हायला हवं....त्याने जे लिहिलंय ,तेच त्याच्या दृष्टीने घडल असेल....
आणि जर आपल्याला , त्या व्यक्तीतले काही दोष जाणवले , तर ही त्या व्यक्तीच्या सच्चेपणाचीच निशाणी !

मला स्वतःला आत्मचरित्र वाचायला फार आवडतात....दैनंदिन आयुष्यातल्या अनेक छोट्या मोठ्या अडचणींपासून ते संकट म्हणाव इतक्या मोठ्या प्रसंगातून मार्ग काढत लोक आपल्या परीने जगण्यातला आनंद ,सौंदर्य  शोधत असतात ...हे सार मला खूप प्रेरणा देऊन जातं.....

याआधी अनेक लेखक पत्नींची आत्मचरित्र वाचली आहेत ...( काही राहुनही गेलीत !)
स्मृतिचित्रे...
आहे मनोहर तरी...
साथ सांगत ( रागिणी पुंडलिक)
कुणास्तव कुणीतरी ( यशोदा पाडगावकर)
रास ( सुमा करंदीकर)
नाच ग घुमा ( माधवी देसाई)

आणि आता हे ....अमलताश.....


तर अमलताशबद्दल.....
पुस्तकाची सुरुवात लेखिकेच्या बालपणीच्या घरापासून होते...इथूनच आपल्याला लेखिकेच्या जडणघडणीची  सुरुवात दिसते.काही कारणास्तव लेखिकेची आई तिच्या माहेरी परत आली , पण तिथे ती आपल्या नशिबावर रडत न बसता ,पुढे शिकून आपल्या पायावर उभा राहण्यासाठी सतत प्रयत्नशील होती. हाच गुण लेखिकेतही आपल्याला दिसतो.आयुष्यात अनेक अडचणी आल्या ,पण शिक्षणाचे महत्व समजून ते पूर्ण करण्याची जिद्द - त्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून केलेली धडपड - अनेक वेळा सासरची मंडळींशी दिलेला लढा - या सर्वांचे बीज लेखिकेच्या बालपणात -घरच्या वातावरणात आणि त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्वात दिसते .

६० वर्षापूर्वीही मेडिकल कॉलेज तसेच होते- किंबहुना तीच challenges -काळामुळे  थोडी जास्तच खडतर वाट -मला क्षणभर माझे शिक्षण आठवले.....

घराच्या दबावामुळे gynaecology सारख्या विषयात मिळालेले PG सोडावे लागले .....सासू प्राचार्या  आणि कवयित्री झाली तरी ती सासुच असते - आई नाही !....

पण अनेक अडचणींवर मात करून त्या practice मात्र चालूच ठेवतात - अत्यंत प्रेरणादायी असा हा भाग !

त्यांचे लहानपणीचे फोटो -त्यातली हसरी सुधा -नंतरच्या आयुष्यात मात्र अनेक झुन्जीनंतर - हास्य हरवून -पोक्त , गंभीर आणि थोडी करारी झाल्यासारखी वाटते.....

संत आणि त्यांची प्रेमकहाणी अगदी रोमहर्षक - अगदी फिल्मी वाटावी अशी - ते भावनांचे चढउतार - आशा निराशेचा खेळ - विरह - मिलन - विरह अशी आवर्तने....लहानपणापासून ज्याला ओळखतो अशा व्यक्तीशी मैत्रीचे नकळत प्रेमात रुपांतर कसे झाले ....ह्याबद्दल फार छान लिहिले आहे....

उभयताना प्रकृतीच्या अनेक अडचणी आल्या - त्यामुळे त्या काही अंशी थकलेल्या , कंटाळलेल्या वाटतात ...संतांच्या लंपनचा  भाबडेपणा , आशावाद -जो संतांमध्ये दिसतो- तो त्यांच्यामध्ये नाही -  त्या अत्यंत practical वाटतात  -आणि ते लेखक पत्नीला आवश्यकच असावे -त्यांचे पाय जमिनीवर असायलाच हवेत .... तेव्हाच लेखक -संत - मुक्तपणे कल्पनेच्या आकाशात भरारी घेऊ शकले....

अनेक वर्षांच्या सहजीवनाचा शेवट संतांच्या अपघाती मृत्यूने झाला - मनाला खूप चटका लावून गेला - तोही अशा वेळी , जेव्हा संत लंपनच्या बाबांच्या मृत्यूचा क्षण लिहिण्याच्या तयारीत होते ....ते लिखाण संतांना थोडे जड जात होते .....कारण त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या अकाली मृत्यूची सावली सतत त्यांची भोवती असे....

संतांचे अनेक पैलू आपल्याला दिसतात ....एक रसिक - जीवनाच्या विविध अंगांचा आस्वाद घेणारा ....विविध प्रकारे जीवन कलाकृतीत आणू पाहणारा ....लेखक ,चित्रकार ,वायोलिन वादक -प्रियकर-नवरा-वडील-मातृभक्त मुलगा ....

लेखिकेचीही कर्तबगारी ,सतत असलेले प्रोत्साहन -पाठींबा - ज्याशिवाय संतांना निर्मिती सहजसाध्य झाली नसती ,कलासक्ती , सामाजिक भान ,उत्तम वैद्यकीय कौशल्य ,खंबीर ,कणखर स्वभाव -पण तरीही प्रेमळ स्वभाव -घरासाठी त्यागाची तयारी....एक स्त्री डॉक्टर म्हणून त्यांनी आलेल्या अडचणीचा केलेला सामना विशेष  कौतुकास्पद !

अनेक लेखक पत्नींच्या  मालिकेतले अजून एक आत्मचरित्र - पण ते विशेष ठरते ते लेखिकेच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे....जरूर वाचण्याजोगे !!


( सहज आठवले म्हणून .....

रविवारच्या लोकसत्तामध्ये ( १७ जुलै) आशुतोष जावडेकरांचा लेख वाचला , The Little Prince आणि त्याचा लेखक सेंट एक्झुपेरी वरचा. त्याच्याही पत्नीने आत्मचरित्र किंवा दोघांच्या सहजीवनावर पुस्तक लिहिलंय...( ते अजून वाचायचा योग आला नाहीये) पण मला वाटतं कि कदाचित The Little Prince मध्ये डोकावणारा सेंट एक्झुपेरी हा ह्या पुस्तकातल्या सेंट एक्झुपेरी पेक्षा खूप निराळा असणार एवढा नक्की ! पुस्तकातून आपल्याला भेटणारा लेखक हा प्रत्यक्ष जीवनात खूप वेगळा असू शकतो. पण मग लेखनात स्वतःचा अंश उतरतो अस का म्हणतात ? सोमरसेट मॉम हा प्रत्यक्ष जीवनात थोडा क्रूर असल्याच ऐकिवात आहे , पण त्याच्या लेखनात हे कधीच जाणवत नाही.....

...किंवा कदाचित असंही असेल....एखादी गोष्ट लिहिताना ,त्यातल्या पात्रांच्या आत , खोल अंतरंगात शिरून ,त्यांच्यासारख बनून लिहाव लागत असणार.....म्हणून आपल्याला तेच दिसतं जे लेखक दाखवू इच्छितो....)