Showing posts with label पंडित हृदयनाथ मंगेशकर. Show all posts
Showing posts with label पंडित हृदयनाथ मंगेशकर. Show all posts

Wednesday, December 30, 2015

मीरा...

" चाला वाही देश " मीराबाईच्या भजनांचा अतिशय सुंदर अल्बम , पंडित हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि लताबाईचा स्वर ! एकाहून एक सरस भजनं आणि गायला त्याहून कठीण....ही गाणी गाता येण्याइतपत तयार व्हावं ही माझी सुप्त इच्छा ! असो ....हे घडेल तेव्हा घडेल...तोपर्यंत माझ्या यातील अत्यंत आवडत्या भजनांबद्दल थोडेसे.....
खरं तर मीराबाई ही राजस्थानमधील ... पण पुढे उत्तर प्रदेशात येऊन राहिली असा उल्लेख आहे. तिच्या या भजनांवर मारवाडीबरोबरच ब्रिजभाषेचा प्रभाव आढळतो .या विषयावर माझा फारसा अभ्यास नाही पण तरीही मला असे वाटते की ,कदाचित ही भजनं मुळ मीराबाईची नसावीत ....काही ओळी ,शब्द ( किंवा कधी पूर्ण भजनच ) नंतर घातलेले असावेत.

" सखी री लाज बैरन भाई ....."

मीरा कृष्णाबरोबर गोकुळी गेली नाही...जाऊ शकली नाही ...जेव्हा तो रथात बसू लागला तेव्हा,शरमेमुळे मागेच राहिली...आता मात्र विरहाने कासावीस झाली आहे...हृदयावर मोठा पत्थर ठेवल्यागत तिची अवस्था झाली आहे... ती म्हणते...इतका विरह सहन करण्याच्या आधी ,माझे अस्तित्व पंचप्राणात विलीन का झाले नाही....त्या योगे तरी कृष्णाशी एकरूप होता आले असते....

चाल केवळ  अद्वितीय....सखी री , गई आणि गोकुळ वरच्या जागा सुरेख...एक विशेष म्हणजे गाण्याच्या  शेवटी येणारा तो खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज...अलगद पुढच्या गाण्यात मिसळून जातो....


"को बिरहिनी को दुख जाणे है....."

विरहिणीचे दुःख तीच जाणे...कान्हा सोडून गोकुळी निघून गेला...आता तिने काय करावे ?...मीरा विवाहित असली तरीही तिने मनोमन कृष्णाला पती मानले आहे...या विरहाग्निचे औषध तिला ठाऊक आहे....ते औषध म्हणजेच कृष्ण तिच्या तनामनात वसलेला आहे...पण या क्षणी मात्र तिला तो आपल्याहून दूर झाल्याचा भास होतोय ....विरहाग्नीने पोळून उठलेल्या मीरेचे दुःख ही दगड-माती-कचऱ्याचे जग काय समजणार ? हरिशिवाय हे जग,हे सुख व्यर्थ आहे !

या गाण्यातील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी ...कोरसचा सुरेख उपयोग...गाण्याला बांधून ठेवायला...गाण्याची सुरुवात तसेच दोन कडव्यांच्या मध्ये ..... तसेच गाण्याचा ताल ( धम्मार ).....





अतिशय सुरेख...तितकीच कठीण गाणी...मनाला ताजेपणा देणारी...मीराबाईच सामर्थ्य की  पंडितजींच्या संगीताच ? माहित नाही....पण आपलं काम श्रवणानंद घेण्याचं...आपण तेच करायचं .............