Tuesday, December 29, 2015

तिन्हीसांज....उडासलेली....

शेखर ताम्हाणे लिखित " तिन्हीसांज  "नाटक ही एक रहस्यमय संगीतिका आहे ( असा त्यांचा दावा आहे )...यात २-३ गाणी जरूर आहेत...जी त्यावेळी ऐकायला छान वाटतात , पण नंतर एकही लक्षात राहत नाही.. .... यातील रहस्य मात्र अगदीच सपक !

मोहन ( अंगद म्हसकर ) एक गाणं हरवलेला गायक,त्याची सुविद्य,श्रीमंत , वकील पत्नी भारती ( शीतल क्षीरसागर ) आणि मुलगा आशुतोष यांच्या सोबत पत्नीच्या प्रचंड मोठ्या वाड्यात राहतोय .मोहनच गाणं त्याच्या प्रेमभंगामुळे हरपलंय ...गेली १४ वर्ष तो एक दारुमय,रिकाम आयुष्य जगतोय.मात्र, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, देवळात आरती सुरु झाली की  त्याच्या अंगात न्यायाधीश संचारतो... आपल्या हरवलेल्या प्रेमाची दाद मागत , जो समोर येईल त्याच्यावर खटला भरत सुटतो.....

आणि अचानक एके दिवशी, त्याची हरवलेली प्रेयसी , शकीला त्याच्या समोर येऊन उभी राहते ...मोहनला त्याच प्रेम आणि गाणं दोन्ही गवसतं..पण त्यातच एके दिवशी अचानक, संकष्टीच्या दिवशी, न्यायाधीश महाराजांचं आगमन होतं....आणि मोहन भानावर येतो, तोपर्यंत शकीलावर प्राणघातक हल्ला झालेला असतो....
इथे पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकात रहस्याचा उलगडा....

आधी या नाटकातील जमेच्या बाजू....मुख्य कलाकारांचा  सशक्त अभिनय , नाटकाला थोडंफार सुसह्य बनवतो .विशेष उल्लेख छोट्या आशुतोषच्या भूमिकेतील श्रीराज ताम्हणकर याचा..तबलाही सुरेख आणि अभिनयही सहज सुंदर,नैसर्गिक. शीतल क्षीरसागर- कर्तबगार ,करारी वकील आणि एकतर्फी प्रेमात होरपळणारी पत्नी म्हणून आवडून जाते. कोर्टातील भावनोद्रेकाचा प्रसंगही  चांगला वठला आहे  . अंगद म्हसकरचे लोभस,देखणे व्यक्तिमत्व मोहनच्या भूमिकेला साजेसे . प्रेम, विनोद तसेच भावोत्कटता- सर्वच प्रसंगात उत्तम अभिनय ...विशेषतः न्यायाधीश संचारल्यावर होणारे परिवर्तन ,त्या प्रसंगातला stage चा वापर प्रभावी .

नेपथ्य आणि प्रकाशयोजना चांगली  - घराचा दिवाणखाना ,व्हरांडा ,बाग  आणि बागेतील कारंज सुंदर . शकीलाची वेशभूषा योग्य , १९३६ साली बायका - अगदी शिकलेल्या असल्या तरीही - स्लीवलेस ब्लाऊझ घालत ,की  लांब आणि फुग्यांच्या  हाताचे ....विचार करण्याजोगा प्रश्न ....

कमी पडते ती गोष्ट...नाटकाची संहिता फार दुबळी,तोकडी. दिग्दर्शनही फार प्रभाव टाकू शकत नाही. इतिहासातील आणि वेशभूषेतील चुकांकडे दुर्लक्ष करूनही नाटक फारसे रंगत नाही.कमकुवत प्लॉट ,पटकन समजून येणारे  रहस्य , कोर्टरूम ड्रामा अशी जाहिरात असूनही  कोर्टातील फक्त दोनच...तेही अर्धेमुर्धे  प्रसंग...
नाटकात संगीत आणि रहस्य दोन्ही पुरेसे स्थान मिळवू शकले नाही...कशाला महत्व द्यावे हे न जाणवल्यामुळे दोन्हींवर अन्याय झालाय....रहस्य पुरेश्या विस्ताराभावी सपक,विरळ वाटतं. पहिला अंक अक्षरशः फुकट गेल्यासारखा वाटतो---प्लॉटचा ,ज्याला buildup म्हणतात तो झालाच नाही...प्रेमालाप आणि गाणी यावर फार वेळ फुकट गेलाय. प्रेमकहाणी दीर्घ आणि रहस्यकथा फार त्रोटक असं काहीसा वाटतं. रहस्यमय , कोर्टरूम ड्रामा म्हणून पाहायला येणारा प्रेक्षक नक्कीच निराश होतो.रहस्याचा उलगडा होताना आणि एकदा मोहनच्या तोंडी असलेले " तेंडूलकरी ,उघडे वाघडे "संवाद खटकतात .

एकंदरीत मोठ्या अपेक्षेने रहस्यमय नाटक पाहायला गेलेला प्रेक्षक निराश होणार एवढं नक्की ...




2 comments: