Friday, January 20, 2017

शोध आणि संवाद

गेल्या काही दिवसात अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट पाहिले. एक विचार मनात आल्याशिवाय राहवत नाही ...कुटुंब आणि कौटुंबिक नातेसंबंध हा मराठी चित्रपटांचा आवडता विषय झाला आहे का ? तसाच स्वतःचा शोध हा हिंदी चित्रपटांचा केंद्रबिंदू होतोय का ? स्वतःचा शोध हा मोक्षप्राप्ती आणि सुख ह्या दोन्ही परस्परविरोधी उद्दिष्टांच्या मुळाशी आहे  आणि  त्यामुळे हिंदी चित्रपट मराठीपेक्षा एक पाऊल पुढे आहे का ?

पण थोडा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं , कौटुंबिक नात्यातही माणूस स्वतःलाच शोधत असतो. किंबहुना कधी त्या नात्यांच्या उबदार वर्तुळात राहून किंवा कधी त्या नात्यांपासून दूर जाऊन तो मी कोण आहे, मला खरंच काय हवंय, मी ऑथेंटिक आयुष्य जगतोय की इतरांनी आखलेल्या चौकटीत जगतोय ह्या प्रश्नांचा मागोवा घेत असतो. म्हणजे वरकरणी कौटुंबिक असलेले चित्रपटही खरं तर स्वतःच्या शोधावर आधारित असतात. पण पूर्णपणे स्वतः च्या शोधांवरील चित्रपटात कुटुंब हे धूसर पार्श्वभूमी असतं , त्यातली पात्रं किंवा नाती ठळकपणे रंगवलेली नसतात.( उदा. तमाशा )

फॅमिली कट्टा , राजवाडे आणि सन्स व ventilator हे मी खरतर almost एका दिवसातच  पाहिलेले 3 चित्रपट .ह्यांना एकाच माळेत गुंफण्याचे कारण म्हणजे त्या तिन्हींतून असणारा कौटुंबिक नातेसंबंधांचा धागा - कधी रेशमी , कधी साधा-सरळ सूती तर कधी जाडाभरडा , गाठी पडलेला.पण तिन्ही चित्रपटातून नातेसंबंधाबरोबरच अजूनही एक कॉमन धागा जाणवला-परस्परातील संवाद ...

Family कट्टा तसा साधा,सरळ ,लिनीअर म्हणता यावा तसा. म्हातारे आईबाप आणि त्यांची दूर राहणारी मुलं . अनेक वर्ष केवळ औपचारिक संवाद . लहानपणी एकमेकांसाठी असलेलं प्रेम हरवलंय ...

याउलट राजवाडे आणि त्यांची मुलं -इथे अतिपरिचय , अतिसहवास -कुणालाही space , privacy देण्याची पद्धत नाही.

व्हेंटिलेटर मात्र अनेक रंगांचं,अनेक पोतांचं वस्त्र … मुख्य रंग बाबा आणि मुलगा यांच्या नात्याचा .

संवाद हरवलेली आणि समजुतीच्या अभावाने रुक्ष झालेली हीे नाती. खूप वेळा असं होतं ...अगदी जिवाभावाचा एखादा माणूस आपल्यापासून दूर जातो , मित्र , एखादं भावंडं किंवा आई वडील सुद्धा. आपण आयुष्यात कितीतरी जणांशी केवळ वरवरचं असं औपचारिक नातं ठेवून असतो, भावनिक गुंतवणूक नसते फारशी.पण कदाचित म्हणूनच ती नाती आपल्याला सोयीस्कर वाटत असावीत. जिथे वेळ द्यावा लागत नाही, फार प्रयत्नही करावा लागत नाही आणि अपेक्षाभंगही होण्याची शक्यता कमी. Ventilator मधल्या राजा कामेरकरनेही कदाचित स्वतःभोवती एक भिंत घालून घेतली असावी.हॉस्पिटलमध्ये जमलेले ,कावकाव करणारे नातेवाईक त्यातलेच. वरवर प्रेम करणारे पण आतून काही वेगळाच agenda बाळगणारे. पण त्यातही काही अगदी genuine लोक दिसतातच आपल्याला, अगदी अनपेक्षित रित्या …

कुठल्याही नात्याचा पाया म्हणजे संवाद  आणि तोही डोळसपणे(!) केलेला.न बोलताच समोरच्याने समजून जावं ही अपेक्षा चुकीची . कुणीही इतकं सुज्ञ नसतं . तसंच दुसऱ्या पिढीचे लोक आपल्याला काही सांगू पाहतायत, ते त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे, समजून घेणे जरूरी . आज Generation गॅप नावाच्या आजारावरचा तो एकमेव आधार आहे.

शेवटी आपल्या आत्मशोधाला नात्यांच्या परिघात राहूनच अर्थ प्राप्त होतो आणि नात्यांच्या आरोग्यासाठी सुसंवाद हवा ...

Saturday, December 24, 2016

एकटा जीव

एकटा जीव

दादा कोंडके यांचं हे प्रांजळ आत्मचरित्र कधी वाचेन असं खरंच वाटलं नव्हतं. त्यांचे चित्रपट म्हणजे फक्त निर्बुद्ध ,द्वयर्थी संवाद युक्त, सुमार अभिनय-गाणी असलेले असं माझं मत होतं. चित्रपटाबद्दल मतपरिवर्तन व्हावं असं काही घडलं नसलं तरी दादा कोंडके या व्यक्तीबद्दल मात्र उगाच मन कलुषित झालं होतं , “ जसे ते ,तसेच त्यांचे चित्रपट,” या ठाम गैरसमजुतीमुळे त्यांच्या विषयी काहीही वाचण्याच्या भानगडीत पडले नव्हते.

‘ पन्नाशीचा भोज्या ’ हे पुस्तक पुन्हा वाचताना ,दादांच्या प्रकरणाशी थबकले.वाटलं , अभ्यंकारांचं पुस्तक मला आवडलं आणि त्यांना दादांचं , मग आपणही  ‘ एकटा जीव ‘ वाचायला हवं.

आत्मचरित्रात जर काहीच अशक्यप्राय , धक्कादायक नसेल तर ते बोर किंवा सपक नाहीतर अप्रामाणिक ,लपवाछपवी करणारं आहे असं वाटतं. याउलट काही गौप्यस्फोट असेल तर “ थापा तर नाहीत ना “ असं वाटत. आत्मचरित्र लिहिणे ही अशी तारेवरची कसरत ! पण मला असं वाटतं की आत्मचरित्र खरं की खोटं हे सांगणं कठीण -सारख्या घटनांचे पडसाद , त्यांचं interpretation प्रत्येकासाठी वेगळ असू शकतं.

Truth is never absolute, it is relative !

दादांनी आपला व्रात्य स्वभाव, गुंडगिरी ,शिक्षणातली एकूणच प्रगती याबद्दल प्रामाणिकपणे लिहिलंय,पण कुठेतरी स्वतःचे थोडेफार समर्थनही केलंय- गुंडागर्दीतुन आपल्याला पैसे कमवायचे नव्हते ,तर मिरवणे कधी मोठेपणा घेणे यासाठी हे सर्व उद्योग केले.

एका संघाच्या सामान्य सेवकापासून ते यशस्वी वगकर्त्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी . ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ अत्यंत यशस्वी लोकनाट्य -माझ्या पिढीला ते मूळ संचात पाहता आलं नाही हे आमचे दुर्दैव . अत्यन्त हजरजबाबी,आणि पोट धरून हसायला लावणारे चुरचुरीत संवाद ज्यात चालू घडामोडींवर भाष्य असे -त्यामुळे प्रत्येक प्रयोग नवा वाटे. ३-४ तास चालणारे प्रयोग म्हणजे कलाकारांची जणू परीक्षाच !

त्यांचा बावळट,अजागळ ,लोम्बती नाडीवाली अर्धी विजार घातलेला अवतार चांगलाच प्रसिद्ध झाला. त्यांच्या जवळजवळ सर्वच चित्रपटांनी चांगली कमाई केली.दादांच्या मते शहरातले उच्चभ्रू लोक जरी त्यांच्या सिनेमाला नावं ठेवत असले तरी गुपचूप अंधारात हसत.ग्रामीण भागात त्यांचे सिनेमा खूपच लोकप्रिय होते.दादा म्हणतात, माझे चित्रपट चालले कारण त्या बावळट नायकात लोकांना आपले प्रतिबिंब दिसे ….

या व्यवसायात राहूनही पूर्णपणे निर्व्यसनी असा माणूस मिळणे दुर्मिळ -दादा तसेच होते.त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती ,काही वेळा धक्कादायक (आशा भोसले), तर काही वेळा काहीशी अपेक्षित (उषा चव्हाण). मंगेशकर भगिनींबद्दलचे त्यांचे विचार खरे असतील असं वाटल्याशिवाय राहवत नाही.यातले सर्वात मनोरंजक प्रकरण म्हणजे ‘ शेणसार बोर्ड’  - जे दादांच्याच शब्दांत वाचायला हवे.

आयुष्याच्या शेवटी सर्व काही असूनही ते एकटे होते. त्यांची खंत,दुःख, एकटेपणा जाणवतो. ”पुढल्या जन्मी पैसे,मन,सन्मान नको ,पण प्रेमाची माणसे दे” - या पुस्तकाचे नाव सार्थक ठरवणारे दादांचे मनोगत.

या पुस्तकाचे शब्दांकन अनिता पाध्ये यांनी केलंय. यात कुठेही त्यांचा आवाज ऐकू येत नाही, दादांचं जाणवतात,यातच त्यांच्यातल्या लेखिकेचे यश आहे.

Friday, December 2, 2016

शब्द -२

मी का लिहिते -

अजून मला कळलं नाही….

खरंच मला काही सांगायचंय -

की आपलं उगाच ….

आणि सांगायचंय तरी काय ?

गोष्टी … त्या मला येत नाहीत

शोधते आहे एक कल्पना ….

काही पात्र ….

माझी अशी ….

माझ्या मनात जन्मून ,

फक्त माझच ऐकतील -

मला वाटेल तसं जगतील ...

मी सांगू तसं वागतील …

नाहीतर सरळ निघून जातील -

गोष्टीतून , जगातून ….

कधी चार उपदेशाचे गोष्टी-

सांगून शहाण करावं लोकांना ?

छे! कसलं कप्पाळाचं तत्वज्ञान ?

उगाच नसता आवेश-

उसना आणलेला आव ...

खरं तर मला पक्कं कळलंय-

हे सारे फक्त शब्दांचे बुडबुडे

जीव नसलेले ,

असण्याचा आव आणू पाहणारे ….

मग बंद करावं का लिहिणं ?

निरुद्देश , अनाकलनीय भ्रमंती …

शब्दांच्या प्रदेशातली ….

सारं कसं शांत होईल …

आणि सुटतील अनेक प्रश्न …

शब्दांनी निर्माण केलेले -

आणि मिळतील उत्तरे -

दोन शब्दांच्या मध्ये

किंवा शब्दांच्या पल्याड …

Monday, November 28, 2016

शब्द

शब्द…. शब्द ...

शब्दांचा पाऊस….

गुदमरावणारा….

कशासाठी ?

मी लिहिते कशासाठी ?

तू वाचतोस कशासाठी ?

तू बोलतोस कशासाठी ?

मी ऐकते कशासाठी ?

नको ...नकोच सांगूस ….

कारण पुन्हा येतील शब्दच...

चोहो बाजूनी घेरत...

इतर सर्व अर्थ पुसत...

मनातल्या विचारांचा धागा तोडत...

पण मनातले विचार ?

तेही शब्दच-

आणि सुंदर कल्पना ?

त्याही शब्दच -

अगदी अमूर्त असल्या तरीही...

मग शब्दशिवाय काहीच नाही ?

काही तलम,अस्पर्श असे ..

जे तुझ्या माझ्यात आहे …

ते काय आहे ?

शब्दांत न मावणारे ?

की शब्दांच्या पलीकडले ?


Monday, October 24, 2016

हर फियरफुल सीमेट्री

हर फियरफुल सीमेट्री

हल्ली कादंबऱ्या कथा वाचायला थोडा कंटाळाच येतो , अगदी माझ्या आवडत्या  रहस्यकथाही ... काही दिवसांपूर्वी लायब्ररीत एका ‘चीन’ वर लिहिलेल्या पुस्तकाच्या शोधात फेरी मारताना हे पुस्तक हातात पडलं…

खरं तर हे पुस्तक अगदी उत्कृष्ट,जरूर वाचावे या पठडीत बसत नाही. पण तरीही काही इंटरेस्टिंग आयडिया आणि वेगवान कथानक यामुळे रंजक नक्कीच आहे...हे पुस्तक वाचताना मनात सहज आलेले काही विचार ….

लेखिका Audrey Niffenegger हिचे याआधीच पुस्तक अत्यंत सुंदर होते , थोडी फँटसी, एक उत्कट प्रेमकथा , आणि शोकांतिका म्हणावी की सुखांतीका असा विचार करायला लावणारी भन्नाट कल्पना होती ( The timekeeper’s wife)

या पुस्तकातही एक फँटसीचा एलिमेंट आहेच. पण त्याबरोबर मुख्य कथानकात सुंदर नात्यांची हळुवार उलगड आहे….

यातली पात्रही अगदी रंगीबेरंगी ,वैविध्यपूर्ण… आणि त्यांचे व्यवसायही नाविन्यपूर्ण...कुणी RJ आहे , कुणी Highgate सिमेटेरी ,लंडनचा Tour Guide आहे , एक क्रॉसवर्ड निर्माण करतो , तर आपल्या नायिका ‘ are simply not interested in education or jobs ‘...वाटतं की ह्यातल्या प्रत्येकाचा थोडा अंश माझ्यात आहे...Marijke जी  नव्या आयुष्याच्या शोधात घर सोडले … तिचा नवरा मार्टिन जो स्वतःच्या भवती एक कोष विणून त्यातच राहू पाहतोय , रॉबर्ट ,उत्कट प्रेम आणि कायमचा विरह- अनुभवणारा ….

अरेरे ! फार पुढे गेले …

(‘झाडाचं भूत’ एक गोष्टीतली गोष्ट - पण अगदी वेगळीच कल्पना ...भीतीदायक आणि कुठेतरी थोडी calming सुद्धा)

तर या गोष्टीत जुळ्या बहिणीच्या दोन जोड्या आहेत...हिंदू शास्त्रांप्रमाणे , आपली जन्मवेळ आणि स्थान याप्रमाणे आपल्या आयुष्याचा क्रम लिहिला जातो…(विश्वास नसला तरी ही कल्पना मला नक्कीच फेसिनॅटिंग वाटते…माझ्या ओळखीची अशीच एक जुळ्या बहिणींची जोडी आहे , ज्यांच्या आयुष्यात खरंच सर्व गोष्टी एकमेकांना समांतर घडतायत...अर्थात त्या नाट्यपूर्ण नाहीत, म्हणून सांगत नाही..)

ही गोष्ट  Highgate सिमेटेरी च्या सान्निध्यात घडते , सिमेटेरीज वातावरणनिर्मिती साठी उत्तम ! (पण आपलं भूत इथे कधीच येत नाही…) ह्यावरून आठवलं, गोव्याला माझ्या काकांच्या घराशेजारीच एक ख्रिश्चन दफनभूमी होती , कधी रात्री तिथून जावं लागलं की पाचावर धारण बसायची , अक्षरशः धावतच घर गाठायचो…

जुलिया आणि वॅलेन्टीना जुळ्या बहिणी , त्यांची आई एडी हिलाही एक जुळी बहीण आहे, पण त्यांची ही Elspeth मावशी गेली अनेक वर्षे आपल्या बहिणीपासून दुरावलेली आहे. अचानक कॅन्सर मुळे Elspeth चा मृत्यू होतो , तेव्हा तिच्या मृत्युपत्रात तिने आपलं सर्व काही आपल्या भाच्यांच्या नावे करून ठेवले आहे हे उघड होते …

इल्सपेथ मृत्यूनंतरही पंचतत्वात विलीन झालेली नाहीये , तिथेच आहे ,आपल्या घरात ,एक पुसट, अस्पष्ट अस्तित्व...एका छोट्याश्या कप्प्यात स्वतःला आखडून घेऊन राहणारं , आणि तिथे सुरक्षित वाटणारं…

नाही , ही तशी भयकथा नाही , पण ह्यातली (थोडीफार) भयनिर्मिती ही खरं तर स्वार्थी मनुष्य स्वभावामुळेच झालीये….

अर्ध पुस्तक झाल्यावर मला आठवलं- हे पुस्तक मी आधी वाचलंय , हे कप्प्यात राहणारं आणि दिवसेंदिवस थोडा आकार आणि शक्ती मिळवणार भूत ओळखीचं आहे की ! आणि त्यातला मांजराचं पिल्लूही - जे अजाणतेपणे माणसांच्या आणि भूतांच्याही मनात भलत्याच कल्पना घालू पाहतंय….

पुस्तक मनोरंजक आहे , पण अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नाही , इल्सपेथ भूत का झाली आणि ती आपल्या घरातच का अडकून राहिली , तसेच एडी आणि इल्सपेथ या बहिणीचं तकलादू रहस्य व त्या मागची कारणमीमांसा दोन्हीही गोष्टी पटत नाहीत , आणि त्यांची चलाखी पकडली गेली नाही हे तर बिलकुलच ….

हाँ , इथे लेखिकेने जी शक्कल लढवलीये, तिला दाद द्यायलाच हवी ….ज्या प्रश्नांची उत्तरं तिला सुचली नाहीत ते सारे प्रश्न तिने आपल्या पात्रांच्या तोंडी दिलेत ….आणि अर्थातच त्यांनाही त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत….

असो , थोडक्यात विश्लेषण - “मनोरंजक पण पुन्हा वाचण्याजोगे नाही ….”

Friday, October 14, 2016

पहिली पायरी

हल्ली काही दिवसांपासून पुस्तकांवर लिहिलेली पुस्तकं वाचायचा सपाटा लावलाय , अर्थात इंग्रजीमध्ये !

बऱ्याच पुस्तकांमध्ये एक लेख जरूर असतो , लेखकाच्या लहानपणातील वाचनानुभवाबद्दल .

पण ह्या लेखकांच्या आणि आपल्या ...खरं तर माझ्या , बालपणीच्या लेखनविश्वात बराच फरक आहे ….

या सर्व लेखकांत एक गोष्ट समान आढळते , या सर्वांना त्यांनी वाचायला कधी आणि कुठे सुरवात केली ते लख्ख आठवतं , मला मात्र मी थेट मोठ्या अक्षरातली पुस्तकं वाचू लागले त्या आधीचं काहीच आठवत नाही , ( नाही म्हणायला इंग्रजी अक्षर ओळख चांगलीच आठवते - चौथीच्या वर्गात असताना ,माझ्या बाजूला बसलेल्या मुलाला मी a b c d लिहून दाखवलं आणि  फुशारक्याही मारत होते !)

माझ्या आयुष्यात एनिड ब्लायटन आणि तत्सम इतर लेखक कधी आलेच नाहीत , माझं लहानपण फक्त मराठी पुस्तकांनी भरलेलं आणि भारलेलं होतं. लायब्ररीपेक्षा पुस्तकं विकत घेऊन जास्त वाचायचे. माझे आजोबा दर सुट्टीत मला १५-२० पुस्तकं घेऊन द्यायचे , त्यांची अखंड पारायणं चालू असायची .

जादूचा घोडा , उडणारा गालिचासारखी साहित्याच्या वर्गवारीत ना बसणारी पुस्तकं आता लक्षातही नाहीत. पण तीसुद्धा सतत वाचायला आवडायची .

भा.रा.भागवत आणि लीलावती भागवतांची अनेक अत्यंत रंजक पुस्तकं वाचली , अर्थात त्यातली बरीच भाषांतरित होती हे नंतर कळलं, पण भा. रां. चा मानसपुत्र फास्टर फेणे आम्हा सर्वांचाच हिरो होता. त्यांचा दुसरा मानसपुत्र बिपीन बुकलवार मात्र काहीसा अप्रसिद्ध . हा बिपिनदादा कधी ओरिजिनल तर कधी गाजलेल्या लेखकांच्या गोष्टी सांगे. एका दिवाळी अंकात आलेली ‘घड्याळाचे गुपित’ मला काही वर्षांपूर्वी मॅजेस्टिक प्रदर्शनात मिळाली - जुना मित्र खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद मिळाला .

दिवाळी अंक - मुलांचे- माझ्या वाचन विश्वाचा महत्वाचा घटक होते. त्यावेळचे दिवाळी अंक balanced म्हणावे असे होते - म्हणजे कविता, गोष्टी,लेख अगदी मुलांना आवडतील अशा प्रमाणात ! मनोरंजन हे आपले काम आहे हे ते अंक कधीही विसरले नाहीत - मागे माझ्या मुलासाठी मी काही दिवाळी अंक चाळले , ते फक्त माहितीपूर्ण लेखांनी भरले होते!

वर्षभर ना मिळणाऱ्या दोन गोष्टी - फराळ आणि दिवाळी अंक माझी दिवाळी खास बनवायचे -आता ह्या दोन्ही गमती संपल्या , ही खंत वाटत राहते ….

काही ओरिजिनल पुस्तकं आठवतायत , ह्यांचे लेखक अप्रसिद्ध … एक होतं ‘गोष्टींची दुलई ‘ - ह्या पुस्तकातल्या २-३ गोष्टी अजूनही आठवतायत - ‘ राजुची डायरी ‘ नावाची गोष्ट  माझी आवडती --राजू नावाच्या काहीश्या एकलकोंड्या मुलाला सांताक्लाउस भेटतो - दरवर्षी एक याप्रमाणे अनेक रंगीबेरंगी डायऱ्या देतो - आणि राजू त्या आपल्या रंगीबेरंगी अनुभवांनी भरून टाकतो - दरवर्षी काही नवं शिकून डायरी भरून टाकण्याची कल्पना मला फारच आवडली होती ! त्यात एक ‘ दुलदुलची गोष्ट ‘ या नावांनीही कथा मला फार आवडे. दुलदुलचं नाक नकट होतं ही गोष्ट दुलदुलला इतकी त्रास देई की त्यासाठी वाट्टेल ते करायची तिची तयारी होती - तिच्या प्रयत्नांना कसे यश येते आणि त्यातून काय गमतीजमती होतात यांची मजेशीर गोष्ट सांगितली होती.

आणि एक मजेशीर गोष्ट - पुस्तक अगदी प्रस्तावनेपासून वाचायचं हा माझा खाक्या - ‘अरगडे ,कुलकर्णी आणि मंडळी हे नाव तुमच्या चांगल्याच परिचयाचे झाले आहे ‘ ही काही  प्रस्तावनांची सुरुवात आठवतेय ,म्हणजे ह्या प्रकाशकांची खरं तर बरीच पुस्तकं असावीत ,- कुणी ‘अ ,कु आणि मं ‘ आपल्यासाठी पुस्तकं काढतायत हे वाचून खूप बरं वाटलं होतं!(अ कु मं च्या पुस्तकात पर्वतीच्या पोटात दडलेलं एक  भुयार आणि पेशवेकालीन गुप्त कागदपत्र होते...)

इतर अनेक भाषांतरित पुस्तकं मी वाचली - टारझन(ग. रा. टिकेकर) , हॅन्स अँडरसनच्या परीकथा ( सुमती पायगावकर), अरेबियन नाईट्स .गुलबकावली ,वेताळ पंचविशीसारखी सदाबहार पुस्तकं सुद्धा .’साने गुरुजींच्या गोड गोष्टी ‘मध्येही बऱ्याच भाषांतरित गोष्टी होत्या ( म्हणजे मराठी बालवाङ्मय फार कमी ओरिजिनल आहे ?त्यावेळी अर्थात या गोष्टीमुळे काहीही फरक पडायचा नाही म्हणा ...)

मग सातवी आठवीत कधी तरी गोनिदा , पु. ल.,भेटले ...स्वामी ,मृत्युंजय ,राजा शिवछत्रपती, वीरधवल यांची पारायणे सुरु झाली ...

ही मोठ्यांच्या पुस्तकविश्वातल्या दीर्घ सफरीची सुरुवात होती ….

बॉम्बे टॉकीज

मध्यंतरी एक थोडे क्लिष्ट पुस्तक वाचत होते . खरं तर ते नीट समजत नव्हतं , पण “कसं समजत नाही ते बघते “ अशा हट्टाला पेटून ते बाजूलाही ठेववत नव्हतं….

मग अधूनमधून, फक्त येता जाता तोंडात टाकावं , तसं एक हलकं फुलक पुस्तकही वाचत होते….बाबू मोशाय यांनी लिहिलेल ‘बॉम्बे टॉकीज ‘. बाबू मोशाय हे नाव चित्रपट लेखनासाठी नवं नाही , पण बाबू मोशाय म्हणजे कोण हे या निमित्ताने मला प्रथमच समजलं…( ते रहस्य मी उघड करणार नाहीये …)

खरं तर हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण आहे , रंजकही आहे पण त्यात संपादनाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो ...एखाद्या विषयावर chronologically , मुद्देसूद लिहिलं नसून , सहज येत जाता गप्पा माराव्यात तसं लिहिलंय , परिणामी विषयांतर-इथून तिथे मारलेल्या उडया -विखुरलेलं लिखाण  ,जणू कुणी आपली रोजनिशी मनात येणाऱ्या सर्व विचारांसकट जशीच्या तशी छापली आहे ….

पण तरीही लेखकाचा सिनेमाचा अभ्यास , प्रेम मात्र पुरेपूर जाणवते - उदा.“ कहा गये वो लोग “ हा पाकिस्तानात निघून गेलेल्या चित्रपट कलाकारांविषयी लिहिलेला लेख .....

तसेच देव आनंद वर लिहिलेला लेख , माहितीपूर्ण असूनही मोठे असल्याने गुणापेक्षा दोषांमुळेच लक्षात राहतात .

याउलट असीत सेन वरचा छोटेखानी लेख - यात मात्र विषयांतराला फार वाव नसल्याने वाचनीय झाला आहे . काहीश्या अप्रसिद्ध पण सुरेल गाणी असणाऱ्या चित्रपटांचे सेन दिग्दर्शक होते -(इथे माझ्या मनातील एक गोंधळ दूर झाला - मी असित सेन हे हास्य अभिनेते आहेत असं समजत होते- आता कळलं की दोन असित सेन आहेत.) अन्नदाता , अनोखा दान तसेच गाजलेल्या सफर,खामोशी ,ममता या चित्रपटांचेही. खामोशीमधील गाण्याबद्दल लेखक म्हणतो “ वो शाम आणि तुम पुकारलो या दोन्ही गाण्यात एक प्रकारची खामोशी जाणवते ! “गुलझारचे अप्रतिम शब्द असलेली ही गाणी नक्कीच पुन्हा ऐकायला हवीत ( पण माझा आवडतं गाणं मात्र ‘हमने देखी है’ - “ हाथ से छुके इसे रिशते का इलजाम ना दो “ सुंदर ओळ !)

“जिन्हे नाझ है हिंद पार वो कहा है “सारखा लेख मदर इंडिया वर सुरु होतो , अनेक वेळा मनोजकुमारला स्पर्श करत हल्लीच्या चित्रपटांवर येऊन थांबतो . रंजक पण विस्कळीत .

मृणाल सेनवर लिहिलेला लेख छोटा आणि सुबक - आता माझ्याकडे भविष्यकाळात पाहण्याच्या चित्रपटांची एक यादीच तयार झाली आहे …

थोडक्यात काय तर जर संयम बाळगला तर हे पुस्तक नक्कीच काही छान आणून जाते ….