Showing posts with label कादंबरी. Show all posts
Showing posts with label कादंबरी. Show all posts

Wednesday, September 5, 2018

पत्र लिहिण्यास कारण की....

हल्ली पत्र स्वरूपातील २ कादंबऱ्या वाचण्यात आल्या. हा लेखनाचा प्रकार मला खूप आवडला/आवडतो.( ह्याला इंग्रजीत epistolary असं म्हणतात.) कादंबऱ्या फार छान आहेत, त्याबद्दल नंतर कधीतरी. पण ह्या कादंबऱ्या वाचून मला माझा पत्रप्रपंच आठवला….

आम्ही खूप पत्र लिहायचो पूर्वी. माझी आई,मावशी,आजोबा खूप छान पत्र लिहायचे. माझी आई मला मी हॉस्टेलला राहत असताना रोज एक चिठ्ठी लिहायची आणि डब्यातून पाठवायची.अगदी साध्या साध्या गोष्टी, पण त्या दिलासा द्यायच्या.खूप वर्ष मी त्या जपून ठेवल्या होत्या.
माझ्या आईकडे ,तिला आणि मलाही , आलेली सर्व पत्र अजूनही जपून ठेवली आहेत. त्यात 'वाचून झालं की हे पत्र फाडून टाक'अशा मजकुराचे सुद्धा एक पत्र आहे. इतरही अनेक पत्र,ज्यातून त्या त्या वेळच्या अनेक आठवणी जाग्या होतात. माझ्या मावस भावाने एक छोटेखानी गोष्टवजा पत्र लिहिलं होतं. त्यांच्या घरासमोर घडणाऱ्या चित्तथरारक धरपकडी बद्दल मजेदार वर्णन केलं होतं.कधी मोठी पत्र लिहायला वेळ मिळाला नाही तर पोस्टकार्ड किंवा अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रातून चार ओळी लिहायच्या.

दुपारी पोस्टमन येण्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या. सकाळी ११ ,दुपारी २.३० . त्यावेळी सारखा दाराजवळ वावर असायचा. आणि एकदा पत्र आलं की लगेच त्याचं उत्तर द्यायचं. ते पत्र पोस्टात टाकलं की दिवस मोजायला सुरुवात ,आता हे पत्र इथपर्यंत पोचल असेल, आता तिने वाचलं असेल, आता ती उत्तर लिहील आणि आता ती पोस्ट करेल. अर्थात सर्वच माझ्यासारखे आतुर नसत . मग कधी15 दिवसांनी तर कधी महिना दोन महिन्यांनी त्याचं उत्तर यायचं. ‘तू ...मामाच्या लग्नात साडी नेसणार की ड्रेस घालणार ?’असाही प्रश्न विचारलेला आठवतोय. ते पत्र मात्र वेळेत आलं असणार...नाहीतर काय उपयोग होता त्याचा ? एका पत्रात ‘ …. फार मस्ती करते. एकदा शेंगदाणा उचलून नाकात घातला. मग उचलून हॉस्पिटल मध्ये न्यावं लागला. फार धावपळ झाली.’ या मजकुराच पत्र आईने जपून ठेवलंय .

(पण जर घर सावरण्याची हुक्की आली तर माणूस निर्दय होऊन घरातला सर्व sentimental पसारा काढायला जातो. सुदैवाने आपल्या आधीची पिढी त्यातली नाही.)

जरी आपण एफबी आणि wa ला आज दोष देत असलो तरीही जेव्हापासून घराघरात फोन आले, साधे बरं का, मोबाईल नव्हे,तेव्हापासून पत्र लिहिणे कमी झाले. अर्थात बाहेर(म्हणजे फॉरेनला) असलेले आपले सुहृद पत्र लिहीत असत ,पण मोबाईल आल्यापासून तेही कमीच झालं. हळू हळू पत्र लिहिणं मागासलेल वाटायला लागलं. मग ई पत्र सुरू झाली,पण ती कामापुरतीच.

(तरीही गेल्या वर्षी खूप काळानंतर भेटलेल्या मैत्रिणींनी मला सुरेख इ मेल पाठवले होते.)

संवाद तर आता फोन आणि आता व्हॉटसअप मधूनही होतो. तरीही ही पत्र इतकी गोड का वाटतात ? फोनमधून विचार कळतात,खुशाली कळते,भावना कळतात.पण मला वाटतं भावनांइतकंच लिहिण्याला महत्व आहे. व्हाट्सप क्षणभंगुर .आपण सारेच रोज रात्री फोन साफसूफ करून झोपतो. पण पत्र राहतात.कधी कधी कित्येक वर्ष ठेवली जातात.पुन्हा काढून वाचली की पुन्हा गप्पा मारल्यासारख वाटत. पुन्हा आठवणींना उजाळा मिळतो.पत्रांना वैयक्तिक जिव्हाळ्याचा स्पर्श असतो.कुणीतरी मुद्दाम बसून, वेळ काढून,विचार करून आपल्यासाठी लिहिलंय, आपला विचार करून लिहिलंय,वॉट्सप्प सारखा येता जाता काहीतरी typela नाहीये.

….आणि मग,कधी कधी अशा पत्रांतून अशी एखादी कादंबरी जन्माला येते…

Monday, October 24, 2016

हर फियरफुल सीमेट्री

हर फियरफुल सीमेट्री

हल्ली कादंबऱ्या कथा वाचायला थोडा कंटाळाच येतो , अगदी माझ्या आवडत्या  रहस्यकथाही ... काही दिवसांपूर्वी लायब्ररीत एका ‘चीन’ वर लिहिलेल्या पुस्तकाच्या शोधात फेरी मारताना हे पुस्तक हातात पडलं…

खरं तर हे पुस्तक अगदी उत्कृष्ट,जरूर वाचावे या पठडीत बसत नाही. पण तरीही काही इंटरेस्टिंग आयडिया आणि वेगवान कथानक यामुळे रंजक नक्कीच आहे...हे पुस्तक वाचताना मनात सहज आलेले काही विचार ….

लेखिका Audrey Niffenegger हिचे याआधीच पुस्तक अत्यंत सुंदर होते , थोडी फँटसी, एक उत्कट प्रेमकथा , आणि शोकांतिका म्हणावी की सुखांतीका असा विचार करायला लावणारी भन्नाट कल्पना होती ( The timekeeper’s wife)

या पुस्तकातही एक फँटसीचा एलिमेंट आहेच. पण त्याबरोबर मुख्य कथानकात सुंदर नात्यांची हळुवार उलगड आहे….

यातली पात्रही अगदी रंगीबेरंगी ,वैविध्यपूर्ण… आणि त्यांचे व्यवसायही नाविन्यपूर्ण...कुणी RJ आहे , कुणी Highgate सिमेटेरी ,लंडनचा Tour Guide आहे , एक क्रॉसवर्ड निर्माण करतो , तर आपल्या नायिका ‘ are simply not interested in education or jobs ‘...वाटतं की ह्यातल्या प्रत्येकाचा थोडा अंश माझ्यात आहे...Marijke जी  नव्या आयुष्याच्या शोधात घर सोडले … तिचा नवरा मार्टिन जो स्वतःच्या भवती एक कोष विणून त्यातच राहू पाहतोय , रॉबर्ट ,उत्कट प्रेम आणि कायमचा विरह- अनुभवणारा ….

अरेरे ! फार पुढे गेले …

(‘झाडाचं भूत’ एक गोष्टीतली गोष्ट - पण अगदी वेगळीच कल्पना ...भीतीदायक आणि कुठेतरी थोडी calming सुद्धा)

तर या गोष्टीत जुळ्या बहिणीच्या दोन जोड्या आहेत...हिंदू शास्त्रांप्रमाणे , आपली जन्मवेळ आणि स्थान याप्रमाणे आपल्या आयुष्याचा क्रम लिहिला जातो…(विश्वास नसला तरी ही कल्पना मला नक्कीच फेसिनॅटिंग वाटते…माझ्या ओळखीची अशीच एक जुळ्या बहिणींची जोडी आहे , ज्यांच्या आयुष्यात खरंच सर्व गोष्टी एकमेकांना समांतर घडतायत...अर्थात त्या नाट्यपूर्ण नाहीत, म्हणून सांगत नाही..)

ही गोष्ट  Highgate सिमेटेरी च्या सान्निध्यात घडते , सिमेटेरीज वातावरणनिर्मिती साठी उत्तम ! (पण आपलं भूत इथे कधीच येत नाही…) ह्यावरून आठवलं, गोव्याला माझ्या काकांच्या घराशेजारीच एक ख्रिश्चन दफनभूमी होती , कधी रात्री तिथून जावं लागलं की पाचावर धारण बसायची , अक्षरशः धावतच घर गाठायचो…

जुलिया आणि वॅलेन्टीना जुळ्या बहिणी , त्यांची आई एडी हिलाही एक जुळी बहीण आहे, पण त्यांची ही Elspeth मावशी गेली अनेक वर्षे आपल्या बहिणीपासून दुरावलेली आहे. अचानक कॅन्सर मुळे Elspeth चा मृत्यू होतो , तेव्हा तिच्या मृत्युपत्रात तिने आपलं सर्व काही आपल्या भाच्यांच्या नावे करून ठेवले आहे हे उघड होते …

इल्सपेथ मृत्यूनंतरही पंचतत्वात विलीन झालेली नाहीये , तिथेच आहे ,आपल्या घरात ,एक पुसट, अस्पष्ट अस्तित्व...एका छोट्याश्या कप्प्यात स्वतःला आखडून घेऊन राहणारं , आणि तिथे सुरक्षित वाटणारं…

नाही , ही तशी भयकथा नाही , पण ह्यातली (थोडीफार) भयनिर्मिती ही खरं तर स्वार्थी मनुष्य स्वभावामुळेच झालीये….

अर्ध पुस्तक झाल्यावर मला आठवलं- हे पुस्तक मी आधी वाचलंय , हे कप्प्यात राहणारं आणि दिवसेंदिवस थोडा आकार आणि शक्ती मिळवणार भूत ओळखीचं आहे की ! आणि त्यातला मांजराचं पिल्लूही - जे अजाणतेपणे माणसांच्या आणि भूतांच्याही मनात भलत्याच कल्पना घालू पाहतंय….

पुस्तक मनोरंजक आहे , पण अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नाही , इल्सपेथ भूत का झाली आणि ती आपल्या घरातच का अडकून राहिली , तसेच एडी आणि इल्सपेथ या बहिणीचं तकलादू रहस्य व त्या मागची कारणमीमांसा दोन्हीही गोष्टी पटत नाहीत , आणि त्यांची चलाखी पकडली गेली नाही हे तर बिलकुलच ….

हाँ , इथे लेखिकेने जी शक्कल लढवलीये, तिला दाद द्यायलाच हवी ….ज्या प्रश्नांची उत्तरं तिला सुचली नाहीत ते सारे प्रश्न तिने आपल्या पात्रांच्या तोंडी दिलेत ….आणि अर्थातच त्यांनाही त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत….

असो , थोडक्यात विश्लेषण - “मनोरंजक पण पुन्हा वाचण्याजोगे नाही ….”