Monday, January 4, 2016

आशा

उध्वस्त एका माळरानी
इवलेसे बीज एकले
वसंताची वाट पाहे
मिटुनी डोळे आपले

बीज हळूच बोलले
जरी मोठा तो उत्पात
आस सोडू नये रे
येणार नक्की पहाट

नाजूक जरी मुळे माझी
शोधीत जाती जीवना
आणि तो सुर्यदेवही
धाडीतो किरणे कानना

हलकेच उघडी पापणी
हिरवीच छोटी पालवी
जणू चाखण्या चव जीवनी
ती हात आपुले लांबवी

वाढीत जाये दरदिशी
ती वेल साजरी सुंदर
मग फुलही धरले तिला
हे सृष्टीचक्र निरंतर

अनेक झाडे वेल वाढले
सृष्टी आली मदतीला
उध्वस्त त्या माळरानाला
जणू हिरवाईचा लेप दिला

पहा सृजनाची बीजे रुजली
आणि कवाडे नवी उघडली
नवीन निर्मितीची बीजे
जणू अस्ताच्या उदरी दडली...



अधुरी कहाणी

साथ आपली संपली
आणि रस्ते दुभंगले
वाहुनी गेलास तू ...
पण मी इथेच थांबले

मागली कित्येक वर्षे
सोबतीने संपली
मात्र एकलीच आता
ना वृक्ष ना सावली

हसण्यात साथ होती
दुःखात हात हाती
तुझ्या सवे अवसही
एक चांदरात होती

मागे वळू नको सख्या
मी ही न पाही परतुनी
बांध फुटेल अश्रुंचा
जाऊ दोघेही वाहूनी

जरी कधी भेट झाली
वाटेत पुन्हा आपली
तडक जा निघुनी तू
तसाच उलट पावली

मी ही कधी ऐकीले
जरी कधी तुझेच नाव
झुकवेन नजर आणि
लपवेन सारेच भाव

नाव तुझे न कामना
काही न उरले जीवनी
अर्थच लागे न आता
अधुरी उरली कहाणी

Friday, January 1, 2016

लिहिता लिहिता ...

आज प्याला रिता आहे
कागदही पालथा आहे
गजबज होती काल जेथे
आज बस शांतता आहे


होते सारे जे विचारी
लिहून थकली गात्रे सारी
क्लान्त या शरीरात माझ्या
अजब अशी शून्यता आहे


नववर्षाची नवी पहाट
नको उगा ते जुने चऱ्हाट
नव्या क्षितीजाच्या दिसण्याची
खरेच का सुरूवात आहे ?


असते नव्या सर्जना आधी
म्हणे एक रिकामी साधी
कोरी करकरी नवीन पाटी
तीच माझ्या आत आहे ?


अक्षरांचा खेळ बांधला
शब्दांचाही मांडी भोंडला
खरेच सांगू पुन्हा लिहीता
वाटे मज मी सुखात आहे….

Thursday, December 31, 2015

निसर्ग

कधी वाटते तडक उठावे
वाटेने या चालत जावे....

सोडून ही मळलेली वाट....
ओलांडून हा जुनकट घाट....

पोहोचावे त्या वनात नीरव ...
गच्च झाडीचा जेथे मांडव ...

खळखळणारा जेथे झरा ....
अलवार सोबत करतो वारा...

पाय सोडूनी जळात बसावे....
मनातले गुज त्यास वदावे.....

खळखळ झरा जातो वाहत ...
ठेवत नाही काही मनात ....

किलबिल कुंजन सुरेख सुंदर
नाजूक ते रव मनही नीडर....

भिनते अंगी ही शांतता ...
शहरी गजबज निघून जाता ...

प्रतिमा तेथे आपुली पाहून ....
परत फिरावे ताजे होऊन ....

Wednesday, December 30, 2015

मीरा...

" चाला वाही देश " मीराबाईच्या भजनांचा अतिशय सुंदर अल्बम , पंडित हृदयनाथ मंगेशकरांच संगीत आणि लताबाईचा स्वर ! एकाहून एक सरस भजनं आणि गायला त्याहून कठीण....ही गाणी गाता येण्याइतपत तयार व्हावं ही माझी सुप्त इच्छा ! असो ....हे घडेल तेव्हा घडेल...तोपर्यंत माझ्या यातील अत्यंत आवडत्या भजनांबद्दल थोडेसे.....
खरं तर मीराबाई ही राजस्थानमधील ... पण पुढे उत्तर प्रदेशात येऊन राहिली असा उल्लेख आहे. तिच्या या भजनांवर मारवाडीबरोबरच ब्रिजभाषेचा प्रभाव आढळतो .या विषयावर माझा फारसा अभ्यास नाही पण तरीही मला असे वाटते की ,कदाचित ही भजनं मुळ मीराबाईची नसावीत ....काही ओळी ,शब्द ( किंवा कधी पूर्ण भजनच ) नंतर घातलेले असावेत.

" सखी री लाज बैरन भाई ....."

मीरा कृष्णाबरोबर गोकुळी गेली नाही...जाऊ शकली नाही ...जेव्हा तो रथात बसू लागला तेव्हा,शरमेमुळे मागेच राहिली...आता मात्र विरहाने कासावीस झाली आहे...हृदयावर मोठा पत्थर ठेवल्यागत तिची अवस्था झाली आहे... ती म्हणते...इतका विरह सहन करण्याच्या आधी ,माझे अस्तित्व पंचप्राणात विलीन का झाले नाही....त्या योगे तरी कृष्णाशी एकरूप होता आले असते....

चाल केवळ  अद्वितीय....सखी री , गई आणि गोकुळ वरच्या जागा सुरेख...एक विशेष म्हणजे गाण्याच्या  शेवटी येणारा तो खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज...अलगद पुढच्या गाण्यात मिसळून जातो....


"को बिरहिनी को दुख जाणे है....."

विरहिणीचे दुःख तीच जाणे...कान्हा सोडून गोकुळी निघून गेला...आता तिने काय करावे ?...मीरा विवाहित असली तरीही तिने मनोमन कृष्णाला पती मानले आहे...या विरहाग्निचे औषध तिला ठाऊक आहे....ते औषध म्हणजेच कृष्ण तिच्या तनामनात वसलेला आहे...पण या क्षणी मात्र तिला तो आपल्याहून दूर झाल्याचा भास होतोय ....विरहाग्नीने पोळून उठलेल्या मीरेचे दुःख ही दगड-माती-कचऱ्याचे जग काय समजणार ? हरिशिवाय हे जग,हे सुख व्यर्थ आहे !

या गाण्यातील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टी ...कोरसचा सुरेख उपयोग...गाण्याला बांधून ठेवायला...गाण्याची सुरुवात तसेच दोन कडव्यांच्या मध्ये ..... तसेच गाण्याचा ताल ( धम्मार ).....





अतिशय सुरेख...तितकीच कठीण गाणी...मनाला ताजेपणा देणारी...मीराबाईच सामर्थ्य की  पंडितजींच्या संगीताच ? माहित नाही....पण आपलं काम श्रवणानंद घेण्याचं...आपण तेच करायचं .............




Tuesday, December 29, 2015

शब्द जुळारी !!

मी तर केवळ शब्द जुळारी ...



भावनांचा पीळ...
लांबलचक वाक्ये...
काही चमकदार शब्द...
काही उद्गारचिन्हे !!!

तोडून फोडून
उलटून सुलटून...
ठेवते समोरासमोर
जरा आलटून पालटून...

कधी जाते जमून
पटकन एखादे यमक
पण असते कुठे त्यात
ती काव्याची महक

नुसतीच बोलीभाषा
असते गद्यच खरे
चांगले म्हटले म्हणून
ठरेल कसे बरे

धन्य ते कवी-शायर
लिहिती सुरेख ओळी
किंवा भावपूर्ण,आशयगर्भ
सुबकशी चारोळी

मी बापडी,उचलून पेन
खरडत राही काहीबाही
मी कसली कवयित्री
मी तर केवळ  शब्द जुळारी !!!

मूर्ती

छे ! नाही !! अजिबात नाही !!!
तू तर "तो " बिलकुल नाहीस....
ज्याला मी शोधतेय
कित्येक वर्षापासून...
तू तर असाच एक आपला
आकाशातला दूरगामी तारा ..

पहिल्यांदा भेटले तुला ...
चक्क देवच समजले !
असाही माणूस असतो का ?
अशा विचारात हरपले...
हळूहळू ओळख...मग मैत्री...
देवाचा माणूस...आणि माणसाचा मित्र....

मग काळाच्या ओघात वाहून गेलो...
कुठे तू...आणि कुठे मी.....
गुपचूप तुझी खबर ठेवून होते
तू मोठ्ठा माणूस झाल्याचे ऐकून होते...
मधल्या काळात माझ्या लेखी...
अधिकच "गुणी" बनलास तू...

मग कधीतरी पुन्हा प्रकटलास ...
या दिव्यजालातून अचानक...
मी आनंदून हात पुढे केला...
अनोळखी नजरेने मात्र तू प्रतिसाद दिला...
आठवण द्यावी तुला...नाही धजावले मी...
"कोण आपण ?" या प्रश्नाला ...प्रचंड घाबरले मी....

असू दे...असतात अशीही माणसे
विसरभोळी....
पण हो...ती तर माणसच असतात.....
आणि तुला तर मी देव बनवलेलं !'
पण तुझे पाय मातीचे होते....
तुझा नाही रे बाबा...माझंच चुकलं !!