Sunday, December 6, 2015

दिसामाजी काही लिहीत जावे ....

गेले काही दिवस काही चांगल लिहून होत नाहीये...किंवा जमत नाहीये म्हणा ....विषय सुचत नाहीत तर कधी काही चांगले विषय सुचले, तरी त्यावर लिहिणे जमत नाही....पेन पुढे सरकत नाही....

मुद्दाम लिहायला बसलं की लेखणीही बंड करते कधी...शब्द उमटतच नाहीत...अनेक विषय बाद करते...छे ! यावर काय लिहायच ?.... हा नकोच ...अनेक शंका !

काही दिवसभराच्या कामाच्या रामरगाड्यातून न मिळणाऱ्या वेळेमुळे असेल किंवा मनाला मोकळेपणे विचार न करू देणाऱ्या चिंतेमुळे असेल .... त्याहीपेक्षा म्हणजे स्वतःच्या लिखाणाचा जो मनात बागुलबुवा निर्माण झालाय त्यामुळे असेल , लिहिणे जमत नाहीये एवढे मात्र खरे....

असो...सर्व दिवस सारखे नसतात ...निसर्गही इतका वैविध्य दाखवतोच की .....कधी कोवळ ऊन आणि अगदी हव तस,सुखद,आल्हाददायक वातावरण...कधी भयानक तल्खली ....कधी ढगाळ, कुंद हवा... कधी बोचरी थंडी....माणूस तर निसर्गाचा नाठाळ ,हटवादी पुत्र ! निसर्गाहूनही मनमानी !

कधी मन बंड करत...काही लिहायचच नाहीये मला....बकवास लिखाण ! कोण वाचणार ते ! किंबहुना यापुढे कधी लिहायचच नाही....

तर कधी नवाच प्रकार ! ....पहिली दोन वाक्य ...अगदी लख्ख...चमकदार ...आणि पुढे ? वैराण वाळवंटच जणू !

कधी  कधी थोड नाटक करतं.... आपल्याला “ लेखकराव “ बनवायला पाहत....फक्त दाखवण्यासाठी लिखाण...मनापासुन नाही, तर प्रदर्शनासाठी.....चकचकीत पण बेगडी, मुलामा दिलेल.....असत मधेच एखाद  सोन्यासारखा तळपत वाक्य....पण नाहीच शक्यतो....कारण हात आणि लेखणी अगदी एक होतात, तेव्हाच काहीतरी उमटतं कागदावर...सुरेख आणि सुरेल....नाहीतर ? नुसत्याच रेघोट्या....

पण या रेघोटयांचाही उपयोग होतो कधीतरी....रेघोट्या एकत्र करून एक झाडू बनवावा आणि मनाचा तुंबलेला नाला साफ करावा.....( शी ! वाईट उपमा ! )....किंवा ह्या रेघोट्या म्हणजे जणू दगडगोटयाचा एक बांधच....जसा कागदावर मनातून उमटतो तसा मनातून नाहीसा होत जातो....विचार पुन्हा प्रवाही होतात....

असं हे लिखाण...सतत लिहू ‍पाहणाऱ्याची ( लेखक म्हणणार नाही) परीक्षा घेतं....सतत प्रश्न विचारत....

आहे तुझ्याकडे चिकाटी ? .... सतत न हरता , न थकता , पुढे जाण्याची ?

आहे वेळ ? आजच्या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट ?

आहे प्रचंड आशा ? जी सतत या कामात येणाऱ्या निराशेला ,frustration ला हरवेल ?

आहे धैर्य ? लोकांसमोर येण्याचं....सत्य सांगण्याचं...आपण कोण आहोत हे मांडण्याचं...आणि सतत आपल्याला कोणीतरी judge करणार हे स्वीकारण्याच ? ( प्रत्येक लेखन हे लेखकाचा थोडा अंश घेऊनच जन्माला येतं....मात्र त्यातून डोकावणारा लेखक  वाचकांना दिसेलच अस नाही...)

तर जसं समर्थ म्हणाले (...त्यात थोडा फेरफार करून...)...दिसामाजी काही लिहीत जावे ....त्यामुळेच, सर्व प्रश्नांना सामोरे जाऊन , हात लिहित ठेवणे हाच उपाय ! त्यातूनच लेखक पुढे सरकतो !

म्हणून,लिहित राहा !!



2 comments:

  1. Agadi msnatala lihila aahes ... asach hota ... pan tu lihita thevalas ... aani khup samarpak lihites ... carry on pls

    ReplyDelete
  2. Agadi msnatala lihila aahes ... asach hota ... pan tu lihita thevalas ... aani khup samarpak lihites ... carry on pls

    ReplyDelete